Saturday, January 2, 2016

अध्यात्म आणि राष्ट्रकारण

काल मित्राशी बोलताना अध्यात्म आणि राष्ट्रकारण यावर विषय निघाला. त्यावरचे माझे विचार खाली लिहीत आहे.

माझा तत्वज्ञानावर गाढ अभ्यास नाही परंतु तरी काही गोष्टी जरूर व्यक्त कराव्याशा वाटतात.
जरी आत्मज्ञान - अध्यात्म आणि राष्ट्रकारण या दोन गोष्टी वरवर एकमेकांपासून दूर आहेत असं भासत असेल तरी माझ्या मते ज्यास पूर्णतः राष्ट्रकारणामध्ये वाहून घ्यायचे असेल त्यास आत्मज्ञान आणि अध्यात्माची अनुभूती काही अंशी का होईना पण होणे फार गरजेचे आहे कारण अंतिमतः राष्ट्रकारणासाठी राष्ट्रीय अस्मिता असणे फार जरुरीचे आहे आणि ती अस्मिता हे त्या राष्ट्राच्या सहस्र आत्म्यांच्या विचारांचे एकत्रित रूप आहे त्यामुळे स्वतः ची ओळख झाल्याशिवाय राष्ट्राची खऱ्या अर्थाने पूर्णतः ओळख होणे जरा अवघडच! तरीही आपण नमूद केल्या प्रमाणे अध्यात्माचे सारेच नियम राष्ट्रकारणास लागू होणार नाहीत हेही खरेच! असे असले तरी राष्ट्रकारण निःस्वार्थ आणि खरोखरी राष्ट्रासाठी करण्यासाठी मुळात त्यात आपला कुठे स्वार्थ तर दडला नाही ना हे त्या राष्ट्रकारण करणाऱ्यास वेळोवेळी चाचपून नक्कीच पाहावे लागेल आणि एखादे कार्य वैयक्तिक अथवा ठराविक समुदायासाठी नसून राष्ट्रासाठीच आहे हे ओळखण्यासाठी अध्यात्म - स्वानुभव
याहून उत्तम मानदंड कोणता? तशा मानदंडाच्या पट्टीने जर का मोजमाप झाले तरच श्री कृष्णासारखे राष्ट्रकारण-राजकारण करणारे घडू शकतात अन्यथा भ्रष्ट आणि अंध राष्ट्रकारण करणारे हिटलर होण्यास विलंब नाही!


आणि राष्ट्रकारण करणाऱ्यास नक्कीच अशी काही पावले उचलावी लागतील ज्यास त्याची अध्यात्माची साधना विरोध करेल पण जर राष्ट्राचे त्यात भले होत असेल तर वैयक्तिक मानसिक द्वंद्वावर तो मनुष्य नक्कीच विजय प्राप्त करू शकेल आणि त्यांस न पटणारी परंतु आवश्यक असणारी पावले उचलण्यास सहकार्य करेल. आणि हाच त्यामागचा जागृत विचार त्यास होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यास बळ देईल. आणि ही गैर पावले आपद्धर्म म्हणून गणली जातील आणि शाश्वत धर्माच्या आचरणात बाधा आणणार नाहीत आणि शाश्वत धर्माच्या आचरणासाठी अध्यात्माची आवश्यकता नाही काय? श्री कृष्णांच्या बाबतीत हेच तर नाही झाले काय? ज्यांस शाप मिळाला असून देखील आपल्या मार्गाच्या आड त्यांनी तो शाप आणून दिला नाही कारण तो शाप वैयक्तिक होता परंतु त्यांचे कार्य राष्ट्रीय स्वरूपाचे होते आणि त्यामुळेच त्यांनी तो झेलला अशा त्या भूतीस अध्यात्मानीच तर सचेतन ठेवले नसेल काय?

No comments:

Post a Comment